मी, तुषार गजानन कामठे, फडणविशी गाजरांना अजिबात भुललो नाही!

वेगवेगळी गाजरे दाखवूनही पिंपरी चिंचवड शहर भाजपची गळती काही थांबायला तयार नाही. आजीमाजी भाजपाई शहाराध्यक्षांनी दाखविलेली प्रलोभने आणि आश्वासने ऐकूनही महापालिका नगरसदस्यांची गळती थांबली नाही. खात्रीचा उपाय म्हणून माजी भाजपाई मुख्यमंत्री आणि राज्यातील विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टाई करूनही आणि वेगळी फडणविशी प्रलोभने, आश्वासनांचे गाजर दाखवूनही पिंपरी चिंचवड भाजपची गळती काही थांबायला तयार नाही. आता चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नगरसेवक तुषार कामठे यांनी आपल्या नगरसदस्यत्वाचा राजीनामा देऊन कोणतीच गाजरे, पक्ष सोडणार्याना थांबवू शकत नाहीत, हे स्पष्ट केले आहे. मात्र यातून शहर भाजपचे स्थानिक नेते, शहाणे होण्याऐवजी वेडावले असल्याचे चित्र शहरात निर्माण झाले आहे. आपण घातलेल्या भ्रष्टाचार, अनाचार, अनागोंदी आणि अनियमिततेच्या गावगोंधळामुळे शहर भाजपला गळती लागली आहे, याचे भान अजूनही या शहर भाजपाई नेत्यांना आलेले दिसत नाही.

या शहर भाजपाईंनी राज्य मंत्रिमंडळातील सदस्य नवाब मलिक यांच्यावर नुसती ईडी ची कारवाई करून चालणार नाही तर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणारे आंदोलन केले आहे. मात्र, नवाब मलिकांवर भाजपच्याच सांगण्यावरून कारवाई झाली, हे स्वयंसिद्ध असतानाच आपलं8 सराईत गुन्हेगारी ही पिंपरी चिंचवड शहरातील भाजपाई मंडळी झाकून ठेवत आहेत. ज्याने कोणताच द्रोह केला नाही, त्यानेच इतर द्रोह्यांवर चिखलफेक अगर आरोपफेक करावी असे, आपली समाजनीती सांगते. मग अनाचार, भ्रष्टाचार, अनियमितता यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेची बजबजपुरी करणाऱ्या शहर भाजपाईंना मलिकांवर आरोप करण्याचा काय अधिकार आहे, हे खरे म्हणजे या पिंपरी चिंचवड शहरातील समान्यजनांनी, या भाजपाईंना खडसावून विचारण्याची वेळ आली आहे. देशद्रोहाइतकाच भयानक असा समाजद्रोह आपल्या भ्रष्टाचारी कारभारामुळे महापालिकेतील सत्ताधारी भाजपने केला आहे.

खरे म्हणजे आता या शहर भाजपाईंना त्याचे बरबटलेपण दाखविण्याची गरज आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या भाजपच्या तीन आणि एक सहयोगी अपक्ष, अशा चार नगरसदस्यांनी ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राजीनामे देऊन, हे बरबटलेपण दाखविणारे घरचे आहेर, या मंडळींना दिले आहेत. आता भाजपच्या माजीआजी शहराध्यक्षांसाह कोणत्याही भाजप नेत्यांच्या कोरड्या भूलथापा आणि पोकळ आश्वासनांना न भुलता काही नगरसदस्य, कमळाबाईंना सोडचिठ्ठी देत आहेत, तर काही देण्याच्या तयारीत आहेत. या राजीनामा देणाऱ्या आणि देऊ इच्छिणाऱ्या मंडळींचे म्हणणे प्रातिनिधिक स्वरूपात नुकतेच राजीनामा दिलेले तुषार कामठे यांनी समाजमध्यमांद्वारे आम जनतेपर्यंत पोहोचविले आहे. तुषार कामठे म्हणतात,

नमस्कार मी, तुषार गजानन कामठे. सामाजिक जाणिवेचे संस्कार घेऊन मी समाजकारणात आलो आणि पहिल्याच निवडणुकीत मायबाप जनतेने मला नगरसेवक पदावर काम करण्याची संधी दिली.. जनतेच्या डोळ्यात आशा होती, बदल घडण्याची.. तीच आशा माझी प्रेरणा झाली, आणि मी अथकपणे कामाला सुरुवात केली, मी भारतीय जनता पक्षाच्या सर्वसमावेशक विचारधारेचा पाईक आहे.. केंद्रातील तसेच राज्यातील विविध नेत्यांचे विचार मला विकासाभिमुख वाटतात. म्हणूनच ५ वर्षात जे काही करायचं ते जनतेसाठी, ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्या लोकांसाठी हे मनाशी ठाम ठरवून मी शिकत गेलो, कामे करत गेलो, पण पक्षातील स्थानिक नेत्यांची व वरिष्ठांची पहिल्यापासूनच अनास्था दिसून येत होती, तरीही त्याकडे मी दुर्लक्ष करून सर्वांचा सन्मान करत होतो, सतत जमिनीवर राहून लोकांमध्ये काम करण्याचेच संस्कार असल्यामुळे लोकांच्या प्रश्नांची व वेदनांची जाणीव मला होतीच..! त्यातूनच पिण्याच्या पाण्याचा मूलभूत प्रश्न हाती घेऊन मी आवाज उठवला आंदोलन केले, उपोषणही केले आणि विश्वास बसणार नाही असा जनसमुदाय माझ्यासोबत उभा राहिला, कचऱ्याच्या समस्यासाठी चे आंदोलन असेल,दारूचे दुकान बंद करण्यासाठी चे आंदोलन,अनधिकृत फ्लेक्स च्या विरोधात आंदोलनात तर माझ्यावर च गुन्हा दाखल केला गेला असो की जनतेच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या भ्रष्टाचाऱ्यांविरुद्ध वेळोवेळी आवाज उठवणे असो, जे काही शक्य होत ते सर्व मी गेली पाच वर्षे करत होतो, पण जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी माझ्या भाजप पक्षाचे शहरातील नेते, पदाधिकारी किंवा आमदार यांचे कधीच सहकार्य लाभले नाही, उलट माझी ठिकठिकाणी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या अडवणूकच करण्यात आली ही वेदना अनेक दिवसांपासून मनात सलत होती. पण तरीही मी जनसेवेचा वसा सोडला नाही, आणि सोडणारही नाही.
नुकताच जनतेच्या ५५ कोटी रुपयांवर डल्ला मारणाऱ्या सिक्युअर आयटी सोलुशन या ठेकेदाराबद्दल मी पुराव्यांसाहित आवाज उठवला, पण शहरातील भाजप नेत्यांनी या विषयातही मला सहकार्य केले नाही, नाईलाजाने ह्या भ्रष्टाचाराबद्दल मी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्याकडे कारवाईची मागणी केली असता त्यांनी तात्काळ ह्या विषयात कारवाईचे आदेश दिले, वेळप्रसंगी माझ्या पक्षातील नेत्यावर जरी गुन्हा दाखल झाला तरी बेहत्तर परंतु माझ्या पिंपरी-चिंचवडकर जनतेला मी कधीच धोका देऊ शकत नाही आणि भ्रष्टाचार कधीच खपवून घेऊ शकत नाही असे दादांनी सांगितले आणि त्यानंतरच संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल झाला, त्यावेळी खऱ्या अर्थाने मी शहरातील नेत्यांमध्ये शोधत असलेली राजकीय प्रगल्भता आणि धडाडी मला माननीय अजितदादांमध्ये दिसली, काहीही झाले तरी जनतेवर अन्याय होऊ द्यायचा नाही या भूमिकेतून त्यांनी मी दुसऱ्या पक्षाचा नगरसेवक असूनही तात्काळ माझ्या रास्त मागणीची दखल घेतली आणि मला सर्वोतोपरी मदत केली, भारतीय जनता पक्षाचा मूळ सर्वसमावेशक विचार मला त्यावेळी अजितदादांमध्ये दिसला.. आणि अनेक दिवसांपासून माझ्या मनात सलत असलेल्या वेदनेला फुंकर मिळाली, अशा प्रगल्भ नेत्यांचे सहकार्य मिळाले तर भविष्यात जनतेच्या आयुष्यात नक्कीच आमूलाग्र बदल घडविण्याची ताकद आपल्याला मिळेल हे लक्षात घेऊन पूर्ण विचाराअंती मी तुषार गजानन कामठे अधिकृतरित्या माझ्या नगरसेवक पदाचा राजीनामा देत आहे. पण जनतेशी माझी असलेली बांधिलकी आजन्म कायम राहिल यात तिळमात्रही शंका नाही, मायबाप जनतेने आजवर माझ्यावर जे प्रेम केलं, विश्वास दाखविला तोच विश्वास पुढच्या काळातही नक्कीच मिळेल याची मला खात्री आहे.
धन्यवाद..!

आपलाच
तुषार गजानन कामठे

————————————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×